सुरतेच्या स्वारीने मुघलांच्या आर्थिक बळाला धक्का दिला आणि स्वराज्याच्या विस्ताराला बळ मिळाले. १६७० मध्ये दुसरी स्वारीही झाली.
सविस्तर इतिहास व माहिती
शिवाजी महाराजांनी जानेवारी इ.स. १६६४मध्ये मोगल साम्राज्यातील अतिश्रीमंत शहर सुरतेवर हल्ला करून शाहिस्तेखान याने पुण्यात येऊन केलेल्या लुटीची सव्याज वसुली केली.
पार्श्वभूमी
मोगल सरदार शाहिस्तेखान ३ वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केली नसती, तर राज्याचे दिवाळे निघण्याची पाळी आली असती.
राजगडापासून ३२५ किमी उत्तरेस असलेल्या दक्षिण गुजरातमधील सुरत शहर सुरत त्यावेळी मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होते. युरोप, आफ्रिका तसेच मध्यपूर्वेशी येथून मोठ्या प्रमाणात व्यापार होई. या व्यापारावरील करातून मोगलांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळे. सुरतेचे शहर मोगलांच्या साम्राज्य सीमेपासून शेकडो किलोमीटर दूर असूनसुद्धा सुरतेला बलाढ्य तटबंदी करण्यात आलेली होती. या किल्ल्यावर व आसपास ५,००० सैनिकांची तरतूद होती.
सुरतेतील आर्थिक व भोवतीच्या सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला मुख्य हेर बहिर्जी नाईक याची नेमणूक केली. सुरतेची बित्तंबातमी काढून बहिर्जीने शिवाजी महाराजांची भेट घेतली व सुरतेवर हल्ला केला असता मोठा खजिना हातात येईल, असे सांगितले. यावर मसलत करून महाराजांनी सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला.
चढाई
आपल्या राज्याच्या राजधानीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोगल साम्राज्याच्या आत घुसून त्यांचे प्रमुख शहर लुटण्याची ही धाडसी मोहीम विजयी करण्यासाठी अतिशय वेगवान व अचूक हालचाली करणे अत्यावश्यक होते. यासाठी मराठ्यांनी फक्त घोडदळ सज्ज केले. डिसेंबर १५, इ.स. १६६३ रोजी ८,००० शिबंदी राजगडावरून सुरुवातीस ईशान्येकडे निघाली. मोगलांच्या ठाण्यांपासून दूर रहात खानदेशातून रायकोट व रायंगन सुभ्यातून थिंगळे सरदार यांच्या मदतीने हे सैन्य तापी खोऱ्यात सोनगड ला उतरले. तुफान वेगाने वाटचाल करीत २० दिवसांत मराठे जानेवारी ५ रोजी १० वाजण्याचा सुमारास सुरतेजवळील गणदेवी गावाजवळ आले. तेथून त्यांनी मोगलांच्या सुरतेतील सुभेदार इनायतखान याच्याकडे वकील पाठवून "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही." असा संदेश पाठवला व त्याच्या उत्तराची वाट न पाहता सुरतेच्या हद्दीवरील उधना गाव गाठले.
लढाई
सुरतेच्या बचावासाठी मोगलांनी ५,००० सैनिकांची तरतूद केलेली असली तरी त्याकाळची एकूण परिस्थिती पाहता सुरतेवर शत्रू चाल करून येणे असंभव वाटणे साहजिक होते. खंभायतच्या आखातातील समुद्रीमार्गावर इंग्लिश, डच व पोर्तुगीज आरमारांचे वर्चस्व होते, उत्तरेला, आणि पूर्वेला शेकडो किमीपर्यंत मोगलांची सत्ता होती. दक्षिणेत शाइस्तेखान नुकताच मोठी फौज घेउन मराठे व इतर शाह्यांचे पारिपत्य करण्यासाठी येऊन गेलेला होता. असे असता तेथील सुभेदार इनायतखान याने सुरतेतील कुमक कमी केलेली होती. कागदोपत्री ५,००० सैनिक असलेल्या सुरतेत प्रत्यक्ष १,००० च्या आसपास लढते सैनिक होते. बहिर्जी नाईक व त्याच्या हेरसंस्थेने याचाही माग लावलेला होता व शिबंदी परत वाढण्याआधीच हल्ला केल्यास सफल होईल असाही सल्ला शिवाजी महाराजांस दिला होता.
मराठे गणदेवीस आलेले कळता इनायतखान घाबरून गेला व त्याने सामोरे येऊन लढाई करण्याऐवजी सुरतेच्या किल्ल्यात पळ काढला. जानेवारी ५ च्या दुपारी त्याच्या काही तुकड्या मराठ्यांसमोर उभ्या राहिल्या. २० दिवस घोडदौड करीत आलेले असूनही मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला व उधन्यास रात्रीकरता तळ न ठोकता रातोरात सुरत गाठले. किल्ल्यात लपून बसलेल्या इनायतखानाकडून अधिक काहीही प्रतिकार न होता मराठे शहरात घुसले व त्यांनी जागोजागी चौक्या बसविल्या. त्याचबरोबर त्यांनी सुरतेच्या बंदरावर हल्ला केला व तेथील धक्क्याला आग लावून टाकली. मोगल आरमाराने समुद्रातून येउन प्रतिकार करू नये यासाठीची ही चाल होती. जरी बंदर नष्ट केले तरी मराठ्यांनी कोणत्याही युरोपीय वकिलाती, किल्ले किंवा आरमारांना धक्का लावला नाही. त्या वारुळात हात खुपसून लढाई जुंपली तर मराठ्यांचा मुख्य हेतू, जो भराभर सुरत लुटून नेण्याचा होता, तो बाजूलाच राहू नये म्हणूनची ही धूर्त चाल होती. मराठे असे अचानक येऊन धडकलेले पाहून युरोपीय सरदार दबकलेले होते व त्यांनीही मराठ्यांची कुरापत काढली नाही.
वसुली
शहराबाहेरून तसेच आतूनदेखील होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध बंदोबस्त करतानाच मराठ्यांनी शहराची वसुली सुरू केली. मोगल ठाणेदार व महसूलदप्तरांचे खजिने पुरते रिकामे केले गेले. दरम्यान पोर्तुगीजांकडे स्वतःचा बचाव किंवा हल्ला करण्यासाठी पुरेसी शिबंदी नाही हे लक्षात येताच त्यांनी पोर्तुगीजांकडूनही खजिना मिळवला. त्याचबरोबर तीन दिवस सतत मराठा सैनिकांनी शहरातील सावकारांच्या वाड्यांतून अमाप संपत्ती गोळा केली.
या सावकारांत वीरजी वोरा, हाजी झहीद बेग, हाजी कासम सारख्या मातब्बर व्यापाऱ्यांचा समावेश होता. मराठ्यांनी मोहनदास पारेख या ईस्ट इंडिया कंपनीच्या हस्तकाच्या वाड्यास हात लावला नाही. पारेख हा दानधर्मी व एतद्देशीयांना मदत करणारा असल्याने तो मृत असला तरी त्याच्याकडून नुकसानभरपाई वसूली केली नाही. इतरधर्मीय मिशनऱ्यांच्या मालमत्तेसही मराठ्यांनी अपाय केला नाही.
फ्रेंच प्रवासी फ्रांस्वा बर्निये आपल्या व्होयाजेस आ ल'इंडे मोगोल या पुस्तकात लिहितो --
"मी लिहिण्यास विसरलो की सुरतेच्या वसुलीदरम्यान शिवाजी, धर्मपरायण शिवाजी, याने रेव्हरंड फादर अँब्रोझच्या ऑर्डर ऑफ फ्रायर्स मायनोर कॅपुचिनच्या इमारतींचा आदर केला. फ्रँकिश पादरी चांगले लोक आहेत तरी त्यांच्यावर हल्ला करू नये असा आदेश त्याने दिला."
दरम्यान इनायतखानाने मराठ्यांकडे वाटाघाटींसाठी वकील पाठवला. शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी तो आला असता त्याने महाराजांवर हल्ला चढवला. हे पाहताच त्यांच्या अंगरक्षकांनी वकिलास ठार मारले आणि पकडून आणलेल्या कैद्यांवरी हल्ला चढवला. यात चार कैदी मारले गेले. संतप्त झालेल्या मराठ्यांनी इतर २४ कैद्यांचे हात छाटून टाकले.
शक्य तितक्या कमी वेळात शक्य तितकी संपत्ती गोळा करून मोगलांच्या इतर ठाण्यांवरून कुमक येण्याआधी सुरतेतून पसार होणे मराठ्यांना अत्यावश्यक होते. अखेर गोळा केलेला मुबलक खजिना घेउन १० जानेवारी रोजी मराठ्यांनी सुरतेतून काढता पाय घेतला. मागावर असलेल्या मोगल तुकड्यांना झुकांड्या देत मराठे पुन्हा तापी खोऱ्यातून खानदेशात व तेथून राजगडाकडे आले.
सुरतेच्या वसुलीवरील पुस्तक
- शोध (सुरतेच्या वसुलीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली एक अभ्यासपूर्ण ऐतिहासिक कल्पनारम्य कादंबरी, लेखक : मुरलीधर खैरनार)
संकलन: शिवजयंती संपादकीय टीम · क्रॉस-रेफरन्स: सभासद बखर, शिवाजी: हिज लाईफ अँड टाइम्स
स्रोत: Wikipedia (English) · मराठी · CC BY-SA
